गोंदियात आदिवासी आरक्षण प्रश्नावर चर्चा; दुर्गाप्रसाद घरतकर यांची भूमिका स्पष्ट जास्तीत जास्त संख्येने मोर्च्यात सहभागी व्हा.


डिजिटल गावकरी न्यूज 

गोंदिया प्रतिनिधी :
गोंदिया जिल्ह्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावर चर्चांना वेग आला आहे. धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात सामावून घ्यावे, अशी मागणी काही काळापासून पुढे येत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजसेवक व काँग्रेस कार्यकर्ते दुर्गाप्रसाद घरतकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

घरतकर यांनी सांगितले की, “आदिवासी समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अजूनही खूप मागासलेला आहे. अनुसूचित जमातींसाठी असलेले आरक्षण हे खऱ्या अर्थाने या समाजाच्या उन्नतीसाठी दिले गेले आहे. त्यामुळे या आरक्षणामध्ये इतर मोठ्या समाजांचा समावेश झाल्यास, आधीच मर्यादित असलेले लाभ खऱ्या आदिवासींपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.”

त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “धनगर आणि बंजारा समाज या मागणीसाठी आपली मते मांडत आहेत, मात्र सरकारने यावर विचार करताना विद्यमान आदिवासी समाजाच्या हक्कांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.”

गोंदिया जिल्ह्यातील विविध भागात या विषयावर चर्चा सुरू असून, समाजातील कार्यकर्ते आणि संघटनांकडून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र घरतकर यांनी केलेले आवाहन हे कोणालाही विरोध करण्यासाठी नसून, “आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण व्हावे” या भूमिकेतून केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी हक्क कृती समिती तर्फे येत्या ६ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘विशाल आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. बंजारा, धनगर आणि इतर गैर-आदिवासी समाजातील काही घटकांनी आदिवासी समाजाच्या आरक्षण व हक्कांमध्ये केलेल्या घुसखोरीच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर दुर्गाप्रसाद घरतकर यांनी आदिवासी समाजातील बांधवांना आवाहन करताना सांगितले की, “आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी होणाऱ्या या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.”आपल्या समाजाच नेतृत्व करावं असे त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या