Photo source : Facebook / chagan bhujbal
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील महायुतीचा पराभव आणि त्यामागे अजित पवारांसोबत युती हे मुख्य कारण असल्याच्या चर्चेवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
संघाच्या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या लेखाने भुजबळ यांना नाराज केले आहे का?
ऑर्गनायझरमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, "होय, त्यांनीच नाही तर अनेकांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या लोकांना बरोबर घेतल्याने नुकसान झाल्याचंही म्हटलं आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. आम्हालाही बरोबर घेतलंय. ऑर्गनायझरची जी भूमिका आहे ती एकंदरीत योग्य आहे."
नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचे उत्तर
अजित पवारांबरोबर नाराज आहात का? असे विचारले असता भुजबळ म्हणाले, "नाराजी कशाबद्दल? मला ५७ वर्षे राजकारणात झाली आहेत. शिवसेनेला जितकी वर्षे झाली आहेत, तेवढी राजकीय वर्षे माझ्या कारकिर्दीची आहेत. मी शिवसेनेत होतो तेव्हापासून पाहतोय, अडचणी येतात आणि जातात. १९८५ मध्ये शिवसेना विधानसभा निवडणुकीला उभी राहिली होती. त्यावेळी मनोहर जोशी वगैरे सगळे पडले होते. मी निवडून आलो होतो. ती निवडणूक मी मशाल चिन्हावर लढवली होती. कारण त्यावेळी शिवसेनेला चिन्ह मिळालं नव्हतं. मी निवडून आलो नसतो तरीही नाराज न होता काम करायचंच ठरवलं होतं. त्यानंतर मी बाळासाहेब ठाकरेंनाही जवळून पाहिलं. त्यांच्यावरही अनेक संकटं आली पण ते डगमगले नाहीत. माझ्यासमोर त्यांचा आदर्श आहे."
शरद पवारांचाही आदर्श
"महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवणार हा दुर्दम्य आशावाद बाळासाहेब व्यक्त करायचे. त्यामुळे शिवसेना पुढे गेली. मी शरद पवारांसह काम करत होतो त्यावेळी पराभवाचे चटके बसले. पण शरद पवारही डगमगले नाहीत. १९९५ मध्ये आम्ही सगळे काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी आमचं सरकार गेलं. पण आम्ही कामाला लागायचं असं शरद पवारांनी सांगितलं होतं. पराभव झाला तरीही कामाला लागायचं असतं. हे मी शिकलो आहे. अडचणी आल्या की जनतेत जायचं. राजकारणात ज्या भूमिकेत मी असतो त्या भूमिकेत असतो." असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या