Sonam Raghuvansi News : पत्नी सोनमनं घेतला पतीचा जीव; भाडोत्री हत्यार्‍यांमार्फत रचला कट.


Digital Gaavkari News

इंदोरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाने देशभरात खळबळ माजवली आहे. पत्नी सोनम रघुवंशीने भाडोत्री हत्यार्‍यांमार्फत पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणात मोठे यश मिळवत सोनमला अटक केली असून, मध्य प्रदेशातील तीन हत्यार्‍यांनाही ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

२२ मे रोजी इंदोरमधील राजा आणि सोनम हे दाम्पत्य शिलाँग येथे मधुचंद्रासाठी गेले होते. ११ मे रोजी त्यांचा विवाह झाला होता. गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ते शिलाँगला गेले, परंतु २३ मे पासून दोघेही बेपत्ता झाले. २ जून रोजी मेघालयातील एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला, तर सोनम बेपत्ता होती. अखेर उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील एका ढाब्यावर ती विमनस्क अवस्थेत आढळली. तिनेच पोलिसांना आपला ठावठिकाणा कळवला होता.

सोनमनं रचला हत्येचा कट

पोलिस तपासात समोर आले की, सोनमनेच भाडोत्री हत्यार्‍यांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक गाईडच्या माहितीनुसार, राजा आणि सोनम यांना बेपत्ता होण्यापूर्वी तीन संशयित व्यक्तींसोबत पाहिले गेले होते. या तिघांनीच हत्या केल्याचा संशय आहे. मेघालय पोलिसांनी सात दिवसांत तीन हत्यार्‍यांना अटक केली, तर एकाचा शोध सुरू आहे. सोनमनेही पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले. “मेघालय पोलिसांनी सात दिवसांत या प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. तीन हत्यार्‍यांना अटक झाली असून, आणखी एकाचा शोध सुरू आहे,” असे त्यांनी म्हटले.

सुरुवातीला सोनमचे अपहरण झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. मात्र, तिनेच हत्येचा कट रचल्याचे उघड झाल्याने हे प्रकरण नाट्यमय वळणावर पोहोचले आहे. इंदोर पोलिसांचे एक पथक सोनमला ताब्यात घेण्यासाठी गाझीपूरला रवाना झाले आहे.

या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असून, पोलिस आता हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या