श्रेयस अय्यर होणारं भारतीय ODI टीम चे कप्तान l IPL मध्ये सुंदर प्रदर्शन केल्यामुळे मिळणारं कॅप्टन पद.


Digital Gaavkari News 
Durgaprasad Gharatkar.

मुंबई, ९ जून २०२५: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये पंजाब किंग्सचे कर्णधार श्रेयस अय्यर यांनी आपल्या नेतृत्वाखाली संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले, मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (आरसीबी) सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. जरी श्रेयसला विजेतेपद मिळवता आले नसले, तरी त्याच्या नेतृत्व आणि फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. आयपीएल २०२५ मध्ये श्रेयसने १७ सामन्यांत ५० च्या सरासरीने ६०४ धावा केल्या, ज्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, श्रेयस हा पहिला कर्णधार ठरला ज्याने तीन वेगवेगळ्या आयपीएल संघांना - कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर), दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स - अंतिम फेरीत नेले. २०२४ मध्ये त्याने केकेआरला विजेतेपदही मिळवून दिले होते.

आयपीएलमधील या शानदार कामगिरीनंतर आता श्रेयस अय्यरच्या भारतीय टी-20 संघात पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे. डिसेंबर २०२३ नंतर श्रेयसने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, ‘इंडियन एक्सप्रेस’च्या अहवालानुसार, २०२६ च्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याला टी-20 संघात स्थान मिळू शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले, “श्रेयस सध्या फक्त एकदिवसीय सामने खेळतो. पण या आयपीएलनंतर आम्ही त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामन्यांपासूनही वगळू शकत नाही.”

कर्णधारपदाच्या शर्यतीतही श्रेयस आघाडीवर

श्रेयस अय्यर केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर कर्णधारपदाच्या शर्यतीतही आघाडीवर आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, श्रेयसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. “श्रेयस आता अधिकृतपणे व्हाइट-बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील झाला आहे,” असे सूत्राने स्पष्ट केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रेयसने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने पाच सामन्यांत २४३ धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतके समाविष्ट होती. याशिवाय, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने ११ डावांत ६६.२५ च्या सरासरीने ५३० धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.

कसोटी संघात स्थान मिळणे कठीण

व्हाइट-बॉल क्रिकेटमधील दमदार कामगिरी असूनही, श्रेयसला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा मार्ग खडतर वाटतो. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठीही त्याची कसोटी संघात निवड झालेली नाही. तरीही, टी-20 संघात त्याच्या पुनरागमनाची शक्यता निश्चितच मजबूत आहे. शिवाय, रोहित शर्मानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी तो प्रबळ दावेदार मानला जात आहे.

श्रेयसला कर्णधार करावे का?

श्रेयसच्या या शानदार कामगिरीनंतर क्रिकेटप्रेमींमध्ये एकच प्रश्न चर्चिला जात आहे - रोहित शर्मानंतर श्रेयस अय्यरला भारतीय संघाचा कर्णधार बनवायला हवे का? भविष्याचा विचार करता, नव्या कर्णधाराला तयार करण्याची ही योग्य वेळ आहे का? यावर तुमचे मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या