शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा.


नागपूर | प्रतिनिधी – नमस्कार मंडळी राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून दर्जेदार कामे पूर्ण करा असा स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नागपूर पॅटर्न’ संपूर्ण राज्यात

श्री. बावनकुळे म्हणाले, “नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमीटर फक्त ८ ते १० लाख रुपयांमध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनवले गेले आहेत. ही कार्यपद्धती इतर सर्व जिल्ह्यांनी अभ्यासून राबवावी.”

त्यांनी ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, रस्त्यांचे काम दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याचे सांगितले. पाणंद रस्त्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे एका महिन्यात निकाली काढण्याचे निर्देशही दिले.

मोजणी व पोलीस संरक्षणासाठीची फी रद्द करण्याचा विचार

महसूल मंत्री म्हणाले की, पाणंद रस्ते, शेतरस्ते आणि सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी तसेच पोलीस संरक्षणासाठी घेतली जाणारी फी बंद करण्याचा विचार सुरू आहे.

रस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरींग करण्यात येईल आणि नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अपील व जमिनीच्या वाटपाबाबत नवे नियम

रस्त्यांच्या वादांबाबत तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

तसेच, जमिनीच्या वाटप पत्रात शेतरस्त्यांचा स्पष्ट उल्लेख नसल्यास मंजुरी देऊ नये, याबाबतही शासनाचा सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या