Digital Gaavkari News
नागपूर: जिल्ह्यातील पारशवडी तालुक्यातील नेऊरवाडा गावात दिनांक 31 में 2025 शनिवारी घडलेली एक भयानक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे. गावातील एक मेहनती शेतकरी रवी काळसरपे यांचा त्यांच्या स्वतःच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना केवळ एका कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण गावासाठी काळजाला चिरून टाकणारी ठरली आहे.
सकाळी 11 वाजता रवी काळसरपे हे आपल्या पत्नीसमवेत नेहमीप्रमाणे शेतावर गेले होते. काही वेळाने त्यांची पत्नी पाणी भरण्यासाठी कालव्यावर गेली. पण त्या क्षणांचा उपयोग करत दबा धरून बसलेल्या वाघाने रवी काळसरपे यांच्यावर भीषण हल्ला केला. हल्ला इतका जबरदस्त होता की त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
पत्नी परत आल्यानंतर डोळ्यांसमोर दिसलेला दृश्य इतका भयानक होता की तिचा आक्रोश आकाश भिडवणारा होता. आपल्या पतीचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून ती बेशुद्ध पडली. गावकऱ्यांनी धावत येत मदत केली, पण तोपर्यंत सगळं संपलेलं होतं यामध्ये एका निष्पाप शेतकऱ्यांचा जीव गेला ही बाब खुप दुःखाची आहे.
यामध्ये वनविभाग कुठे होता ? यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या परिसरात वाघाची पूर्वीपासून हालचाल असल्याची माहिती असूनही वनविभाग झोपेत का होता? ना कोणती सतर्कता, ना कोणते सिग्नलिंग, ना ड्रोन, ना गस्त, ना फायर अलार्म – मग या यंत्रणा नक्की करतात तरी काय?
गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत वनविभाग आणि पोलीस यंत्रणेला जबाबदार धरले आहे. रवी काळसरपे यांचा मृतदेह देखील वनविभाग आणि पोलिस येईपर्यंत गावकऱ्यांनी स्वतः रुग्णालयात हलवला. ही बाब शासनाच्या निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण आहे.
"रवीने कुठला गुन्हा केला होता?" - गावकऱ्यांचा सवाल
रवी काळसरपे यांनी फक्त आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आणि शेत सांभाळण्यासाठी शेतात पाऊल ठेवलं होतं. पण त्या शेतातच त्यांना जीव गमवावा लागला. त्यांनी कुठला गुन्हा केला होता? असा सवाल आज गावकऱ्यांच्या डोळ्यांतून ओसंडून वाहतोय.
शासन आणि वनविभाग फक्त पंचनाम्यासाठी जागं होतात?
घटना घडल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी पंचनामा केला. पण पंचनाम्यात केवळ मृतदेहाचा तपशील नोंदवला जातो, माणसाच्या डोळ्यातील अश्रू, कुटुंबाच्या उदास जगण्याची हकिकत कुठे नोंदवली जाते?
आज रवी काळसरपे यांच्या घरात चूल पेटणार नाही, त्यांच्या मुलांना शाळा बंद करावी लागेल, शेतीकडे बघणारं कोणी उरणार नाही. याची जबाबदारी कोण घेणार? सरकार की वनविभाग?
वन्यजीव संरक्षण महत्त्वाचं, पण माणसाचे प्राणही महत्त्वाचे नाहीत का?
वाघ हे निसर्गाचं सौंदर्य आहेत, त्यांचं रक्षण महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी ग्रामीण जनतेचे प्राण धोक्यात घालणं कितपत योग्य आहे? दरवर्षी अशा घटना घडत आहेत, पण शासन फक्त बातम्यांनंतर उपाययोजना करतं – ही व्यवस्था बदलली पाहिजे.
गावकऱ्यांचा संताप आंदोलनात रूपांतरित होणार?
या घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी निषेध केला असून जर लवकरच ठोस पावलं उचलली नाहीत, तर हा संताप लवकरच आंदोलनात रूपांतरित होईल, यात शंका नाही.
0 टिप्पण्या